कबीरचा लक्ष्यवेधी ‘शिधा’
भारतीय बांधवांच्या मनोभूमीत महात्मा बुद्ध, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले इ. महापुरुषांचे मानवतावादी विचारही साहित्यिकांच्या, समाजसुधारकांच्या आणि विचारवंतांच्या वाणी, लेखणी आणि आचरणामधून आविष्कृत होत आहेत. याचे जगातील आदर्श उदाहरण म्हणजे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ होय! त्यांचे बोलणे, वागणे, अभ्यास, चिंतन, लेखन आणि चळवळी यामध्ये कमालीची सुसंगती असल्यामुळेच त्यांना भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी महापुरुषांचे विचार, जगातील राज्यघटना आणि भारतीय समाजव्यवस्था यावर सखोल चिंतन करुन स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, धर्म निरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टी इ. विचारांना भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केले. पुढे आयुष्यभर हे संविधानवादी विचार घेऊन भारतीय समाजात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय चळवळी केल्या. त्यांच्या या योगदानामुळेच भारतीयांमध्ये पुरोगामी आणि परिवर्तनवादी साहित्य चळवळी विविध नावाने निर्माण झाल्या याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठी साहित्यात उदयाला आलेले ‘साठोत्तरी साहित्य प्रवाह’ होय. ज्या साहित्यप्रवाहांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, धर्म निरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टी इ. विचार केंद्रस्थानी आहेत ते संविधानवादी साहित्य होय. अशा संविधानवादी साहित्य प्रवाहामधील महत्त्वाचे साहित्यिक कवी म्हणजे ‘कबीर ताटे’ होय.
कबीर ताटे हे मौजे वहागाव ता.कराड येथील गावकुसाबाहेरील वस्तीतील रहिवासी. आई मोलमजुरी आणि वडील गवंडी काम करणारे, मुला-बाळांनी शिक्षण घेऊन सन्मानाने जगावे अशी त्यांची अपेक्षा. कबीर ताटे यांनीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन मराठी विषयात बी.ए. पर्यंत शिक्षण घेतले. परंतु शेवटच्या वर्षाला इंग्रजी विषयात नापास झाल्यामुळे पुढचे शिक्षण थांबले. नंतर नोकरीच्या शोधात वहागाव व्हाया मुंबई मार्गे दिल्लीपर्यंत प्रवास केला पण नोकरी मिळाली नाही. शेवटी त्यांच्याच गावातील दयावंत संस्था चालकामुळे वहागाव हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून नोकरी मिळाली. तिथे काही काळ त्यांचे मन रमले. नंतर पोलीस खात्यात पोलीस म्हणून नोकरीस लागले. पोलीस खात्यात निवृत्तिपर्यंत नोकरी केली. संत कबीर जसे आयुष्यभर विणकाम करत असताना सदाचारात आणि दोह्यात रमले तसेच हे कबीरही पोलीस खात्यात असूनही सदाचारात आणि संविधानवादी काव्यलेखनात रमले.
कबीर ताटे यांना कॉलेज जीवनापासून काव्यलेखनाचे वेड होते. त्यांची पहिली कविता कॉलेजच्या ‘वाटचाल’ या भित्ती पत्रकात प्रसिद्ध झाली. नंतर विविध वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. तसेच बारामती, पुणे, उंडाळे, कोल्हापूर, आळंदी, सातारा येथे आयोजित केलेल्या विविध साहित्य संमेलनात, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या कवितांना साहित्यिकांनी, साहित्यरसिकांनी दाद दिली. ‘लोकमत’ सारख्या दिवाळी अंक स्पर्धेत त्यांच्या कवितेला प्रथम क्रमांक मिळाला. कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच केशव मेश्राम, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज इ. अनेक कवींच्या कवितांनी त्यांना वेड लावले होते. घरात-वस्तीत बुद्ध, फुले, आंबेडकर जयंती निमित्त जे विचार त्यांनी ऐकले तेच त्यांच्या कवितांमधून आले आहेत. अशा संविधानवादी कवितांचा ‘शिधा’ वाचकांसमोर या काव्यसंग्रहाच्या रूपाने येत आहे.
कबीर ताटे यांच्या ‘शिधा’ या काव्यसंग्रहातील कविता भूक, गरिबी, निसर्ग, प्रेम भगवान बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आई, बालकविता, पोलीस, व्यक्तिचित्रपर, समाज आणि चारोळ्या अशा स्वरूपाच्या विषयाशी निगडीत आहेत. संत कबिराच्या-
‘ऐसी वाणी बोलिए,
मन का आपा खोय
औरों को शीतल करे,
आपही शीतल होय’
या दोह्यांप्रमाणेच या कबिरानेही आपल्या कवितांमधून सत्याचे, सदाचाराचे दर्शन घडवून वाचकांसमोर आदर्श ठेवला आहे. हे विचार त्यांच्या जगण्यातून आले आहेत. त्यांच्या बहुसंख्य कवितांमधून त्यांचे आत्मकथन वाचायला मिळते. हे या कवितांचे यश मानावे लागेल. ‘भूक-गरिबी’ या विषयावरील कवितांमध्ये भूमिहीन मजूर बेभरवशाच्या रोजंदारीमुळे कित्येक दिवस काम न मिळाल्यामुळे भूक भागविण्यासाठी घरातील गुळाचे पाणी पोटात घालून वेळ मारून नेत असताना आई, वडील, बायको, भाऊ आणि लंगडी कुत्री यांची भुकेमुळे होणारी तडफड ‘त्या दिवशी’ या कवितेमध्ये मांडली आहे. कवितेच्या शेवटी-
‘त्या दिवशी घरात
काय सुद्धा नव्हतं
नुसतं गुळाचं पाणी
पोटात कढत होतं’
या काव्य पंक्तीमधून भूक आणि गरिबांचे नाते सांगून गरिबीमुळे पोट भरता येत नाही हे धगधगते वास्तव मांडले आहे. अशाप्रकारे ‘माझा पगार’, ‘मिलो’, ‘दिवाळी’, ‘तेव्हापासून’, ‘दु:ख’, ‘कसं जोडायचं ठिगाळ’ यारसाख्या कवितांमधून गरिबीमुळे भूक भागावी म्हणून माणसांच्या जीवनाची होणारी परवड मांडली आहे. ‘तेव्हापासून’ या कवितेत-
‘पहिल्या पगाराला तिला
नवी चोळी आणली
अन् एकाएकी चोळी बघून
आय रडाय लागली’
‘शाळा शिकलास अन्
झाडू मारायची नोकरी लागली’
आईला पहिल्या पगारात चोळी घेतल्याचा आनंद नाही तर आत्मभानामुळे मुलगा शिकूनही झाडू मारायची नोकरी करतो याचं दु:ख झाले. शिकून साहेब व्हावे असे स्वप्न बाळगणाऱ्या आईचे स्वप्नभंग अस्वस्थ करते. भूक ही जन्माबरोबरच मिळते परंतु गरिबी ही मानवनिर्मित आहे. त्याचे स्वरूप कवीने काही कवितांमधून मांडले आहे.
निसर्ग आणि प्रेम विषयांवरील ‘झाडांची कविता’, ‘पावसाचे गाणे’, ‘किलबिल’, ‘पाखरांची हाक’ आणि ‘माझी कविता गवळण’ इ. कवितांमध्ये निसर्गाच्या अनोख्या रुपाचे दर्शन घडते. ‘झाडांची कविता’ मध्ये झाडं आणि माणसांमधील फरक सांगून झाडांच्या योगदानाचा आदर्श माणसांनी घ्यावा असे सूचित केले आहे. तर-
‘ऊन पावसाच्या खेळात
सप्तरंगाची उधळण
कशी ठुमकत चालली
माझी कविता गवळण’
कवीने ‘माझी कविता गवळण’ मध्ये कवितेला गवळणीची उपमा दिली आहे. निसर्गाच्या विविध रुपांत गवळणीची सर्व वैशिष्ट्ये कवीला या कवितेत दिसतात. ‘किलबिल पाखरांची’ मध्ये शिवार आणि शेतातील जमीन, पेरणी, पाखरं, शेतात राबणाऱ्या बैलांचे आणि शेतकऱ्याचे दर्शन घडविले आहे. ‘पाखरांची हाक’ ही कविता बालकवीच्या ‘फुलराणी’ या कवितेची आठवण करून देते. ‘फुलराणी’ मधील फुलराणी आणि ‘पाखरांची हाक’ मधील चिमणीचे जगणे निरागस आणि आनंददायक आहे. म्हणून आजारी चिमणी बरी व्हावी म्हणून निसर्गदेव-देवतांचा धावा करणारे पोपट, कोकिळा, कावळा इ. पाखरे निसर्ग देवांच्या कृपेने चिमणी बरी झाल्यावर आनंदाने ‘आभाळ भरारी’ घेतात. ही बालकवीची कवितामधील निर्मळता या कवीच्या या विषयांवरील कवितांमधून वाहताना दिसते. निसर्ग रुपांमधून कवीच्या प्रेमकविता साकारलेल्या आहेत. या दृष्टीने त्यांच्या ‘हिरवळीवर घर फुलविण्यासाठी’, ‘कढ’, ‘विरहाच्या वादळात’, ‘कसे हसणार घर?’, ‘प्रतिक्षेत’ या कविता हृदयाला भिडणाऱ्या आहेत. या निसर्ग आणि प्रेम कवितांचे वैशिष्ट्य हे की, या प्रकारच्या कवितेतील प्रेयसी ही प्रियकराची पत्नी आहे. त्यामुळेच ही प्रेयसी काळजाचा तुकडा, चंद्र, सूर्य मागत नाही तर गरिबीवर प्रतिकूलतेवरती मात करुन सुखी होण्याची स्वप्ने बघताना दिसते. अशा प्रेयेशीला सुखी करण्यासाठी धडपडणारा प्रियकर या कवितांमधून दिसते. तर कधी-
‘तू म्हणून बरंच काही सहन केलंस
अन् चालत राहिलीस अन्वाणी
घरं फुलविण्यासाठी झिजलीस
अन् डोळ्यातच जिरवलेस कढत पाणी’
प्रेयेसीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा प्रियकर दिसतो. हे या प्रेम कवितांचे वेगळेपण नारायण सुर्वे यांच्या काही प्रेम कवितांची आठवण करुन देते. ‘माझ्या कवितेच्या गावी’ या कवितेतील-
‘संत चोखोबांचे नाव
हृदयाचा घेते ठाव
माझ्या कवितेच्या गावी
नाही दुजाभाव’
या काव्य पंक्तीमधून आध्यात्मिक समतेबरोबरच सामाजिक समतेचा पुरस्कार केला आहे. बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विषयांवरील बहुसंख्य कवितांमध्ये बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, विचारांमुळे आणि त्यांच्या योगदानामुळे आत्मभान आलेल्या दीन-दलितांच्यामध्ये वाणी, वर्तन आणि लेखणीमध्ये झालेला क्रांतिकारक बदल व्यक्त झाला आहे. डॉ.आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये दीन-दलितांसाठी घटनात्मक तरतुदी केल्यामुळे तसेच ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या उपदेशामुळे जागृत झालेल्या समाजातील-
‘माय म्हणायची
बाबासाहेब आपला श्वास
दीन-दुबळ्यांसाठी त्यांनी
तयार करून ठेवला घास’
या काव्य पंक्तीतील ‘घास’ म्हणजेच ‘संविधान’ होय. या संविधानाच्या आधारे शिक्षण घेऊन नोकऱ्या मिळवून समृद्ध व सदाचारी जीवन जगावे असे सूचित केले आहे. भीमा तुझ्यामुळे, बाबासाहेबावानी शाळा शिक, वय हाय तवर, पाटलाच्या लग्नात, माफ कर लक्ष्मी, आय, इ. कवितांमधील परिवर्तनवादी विचार वाचकांना अंतर्मुख करतानाच-
‘तुझ्यामुळे भीमा
बळ हातास आले,
भाळी सटवीचे लिखाण
आम्ही पुसून टाकले’
पारंपरिक शोषिक समाज व्यवस्थेला आणि रुढी-परंपरेला नाकारलेले दिसून येते तर ‘पाटलाच्या लग्नात’ या कवितेतील दलितांनी वेगवेगळ्या पंक्तीत उकिरड्यावर बसून जेवायला नाकारल्यावर बिथरलेल्या गावानं गाव जेवणच बंद केले. अशाच प्रकारे अस्पृश्यतेची वेदना ‘डाग’ या कवितेमधून व्यक्त झाली आहे. हा विद्रोह करण्याची ताकद-
‘बाबासाहेब, गावाबाहेरच्या आपल्या वस्तीत
तुम्ही पेरला उजेड अन्
पिढ्यान पिढ्या थैमान घालणारा अंधार
काढला होरपळून’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच प्राप्त झाली. हे नमूद केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार सौंदर्याचा वारसा चालविणाऱ्या दया पवार, केशव मेश्राम, नारायण सुर्वे, बाबुराव बागुल इ. अनेक साहित्यिकांबद्दल ‘मी त्यांची आई, विद्रोही कविता, माझं नाव’ या कवितांमधून कृतज्ञता व्यक्त करून ‘शब्दांची विजवाणी, घोटभर पाणी, कोण तुमचा धरणार हात’ इ. कवितांमधून विद्रोही कवी अरुण कांबळे यांच्यासारखे शब्दांचे सामर्थ सांगितले आहे. तर
‘माणुसकीचे परम पुजारी
तेच बनले दीन-दलितांचे कैवारी
अशा थोर समाजसुधारकांचे
पोहचवू विचार आम्ही घरोघरी’
महापुरूषांचे विचार घरोघरी पोहोचवण्याचा वसा आणि वारसा घेतल्याचे ठामपणे सांगितले आहे. ‘प्रकाशाची गाणी’ या कवितेमध्ये स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना वैधव्य आल्यावर ‘सती’ जायला भाग पाडणाऱ्या पुरुषप्रधान व्यवस्थेला नष्ट करण्याचे काम महापुरुषांनी केल्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अशाप्रकारे विचार प्रधान कवितांमधून संविधानवादी विचार सौंदर्याचे दर्शन घडते. म्हणून या ‘कविता’, काव्यसंग्रहाचा गाभा आहे असे माझे मत आहे.
‘आई’ विषयावर कवी यशवंत, माधव जुलियन, फ.मु.शिंदे, नारायण सुर्वे इ. अनेकांनी कविता लिहिल्या आहेत. परंतु कबीर ताटे यांच्या आईवरील कवितांची जातीकुळी वेगळी आहे. भूमिहीन शेतमजूर किंवा मजुरी करणाऱ्या कुटुंबातील सासू-सासरे, दीर-भावजय, पती असेल तर सवत इत्यादींना पेलणारी-
‘तरुणपणी आई
नागासारखी डुलायची
सारं घरदार
आपल्या शिरावर पेलायची’
अशी आई कबीर ताटेंच्या कवितेत दिसते तर वैधव्य आलेल्या किंवा दुबळ्या पतीमुळे कधी आईलाच बापाची भूमिका बजवावी लागते. लेकरं-बाळं झालेल्या स्वत:च्या मुलाला डोळ्यात आसवं आणून लेकरां-बाळांना जगविण्यासाठी मिळेल ती नोकरी करण्याविषयी विनवणी करते तसेच आई-वडिलांना विसरणाऱ्या मुलांबद्दल-
‘त्यांनी मांडलाय आता
त्यांचा सुखाचा संसार
जन्मदात्या माय-बापाचा
कसा वाटतोय भार’
मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आई’ कवितेत-
‘आई जाते
आईपण मागे ठेवून
पोरक्या झालेल्या लेकराला
आयुष्यभर पुरलं असं धन ठेवून’
आईचे धन म्हणजे आईचे विचार आणि आठवणी आयुष्यभर पुरुन उरतात हेच सांगितले आहे.
या काव्यसंग्रहातील बालकवितांमधून बालमानस व्यक्त झाले आहे. ‘ढबी’ कविता वगळता सर्व बालकवितांमधून ‘चिमणी’ आलेली आहे. लहान मुलांना रुचतील, पचतील अशा ‘अंगाई’ ‘चिमणीचे घर’ आणि ‘मी कोण?’ या कवितांमध्ये बालजगाचे दर्शन घडते. तर ‘अशी आमची लाली आणि ढबी’ या दोन व्यक्तिचित्रणावर कवितांमधून निरागस मुलीचे जगणे आले आहे.
‘अशी आमची लाली
कवितेतील पावसाला घाबरते,
घरातल्या घरातच वेडी
छत्री उघडून बसते’
लालीला पाऊस आणि छत्रीचे नातं कळते पण छत्रीचा वापर नेमका कुठे करायचा हे कळत नाही हीच तर गंमत येथे मांडली आहे. तर-
‘गोरीपान आमची ढबी
कधी कधी रुसायची
खाऊ देतो म्हटल्यावर
गळ्यातच येऊन पडायची’
ढबीचे गुणविशेष नेमक्या आणि मोजक्या शब्दात आविष्कृत झाले आहेत. मराठी कवितेमध्ये बालमानस कमी दिसते. या कवीने त्यांच्या कवितेमधून बालभावना व्यक्त केल्या आहेत. पोलिसांचे जीवन म्हंटले तर समाजसेवेचे आणि देशसेवेचे व्रत आहे. समाजात सुरक्षितता राहावी म्हणून दैनंदिन जीवनात तसेच सार्वजनिक सण-समारंभात, शासकीय कार्यक्रमात चोख बंदोबस्त पोलीस करतात. या कवीचे संपूर्ण आयुष्य पोलीस खात्यात गेल्यामुळे त्यांनी आपल्या पोलीस जीवनावरील कवितांमधून या खात्याचे व पोलिसांचे अंतरंग उलगडून दाखविले आहेत. पोलिसांचा संबंध बऱ्यापैकी गुन्हेगारांशी येतो. अशाच चारित्र्याच्या फक्त संशयावरुन पत्नीची निर्दयपणे हत्या केल्यामुळे तुरुंगात सजा भोगून आलेला कैदी-
‘डोळे आणि कान
यात चार बोटांचे अंतर
सत्य कळून चुकले
असा अपराध घडल्यानंतर’
ऐकणं आणि पहाणे यातील पाहणेच किती महत्त्वाचे आहे. हे सांगून जातो. ‘आम्हा पोलिसांना’
जनहो! ‘तुमची एकी’, ‘तिथे माउली हजर’, आणि ‘कवी मनाचा पोलीस’ या कवितांमधून प्रामाणिकपणे नोकरी करणाऱ्या पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेचे तसेच होणाऱ्या वेदनेचे दर्शन घडविले आहे. तसेच पोलिसांची कैफियतही मांडली आहे. तर ‘तिची कैफियत’ या कवितेत कमी पगारामुळे सदैव आर्थिक ओढाताणीत जीवन जगणारी पत्नी प्रामाणिक ड्युटी बजावणाऱ्या आपल्या पतीला-
‘तुम्हाला काय व्हतया
महिन्याचा ‘हप्ता’ गोळा कराय?
म्हागाय वाढली, पगारात उठा बसायचं
आम्ही लागलो मराय!’
पोलीस निवास परिसरातील इतर पोलिसांप्रमाणे हप्ते गोळा करुन घरातील वस्तू, दागदागिने, कुटुंबाची हौस मौज करतात. मग तुम्हाला हप्ता गोळा करायला काय होतंय? असा प्रश्न विचारते. या कवितेत पोलीस खात्यातील भ्रष्टाचारावर बोट ठेवत असताना कमी पगारातही अत्यंत प्रामाणिकपणे देशसेवा आणि समाजसेवा करणारेही पोलीस आहेत. हे या कवितेत दिसते. कवीने पोलिसांना मिळणाऱ्या कमी पगाराकडेही सरकारचे लक्ष वेधले आहे. या कवितेतील उपरोध लक्षात घेण्यासारखा आहे.
व्यक्तिचित्रणपर अशा ‘सविनय जयभीम! लक्ष्मण माने व रावसाहेब! या दोन कवितांमधून सोबतच्या समूहासह बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या लक्ष्मण माने यांचे बद्दल-
‘तुझे धर्मांंतर इथल्या प्रत्येक गुलामांना
मार्गदर्शक ठरावं
अन् त्यांनीही डोळसपणे
तुझ्या पावलावर पाऊल ठेवून
मानव मुक्तीच्या उजेडाची गाणी गावी’
कृतज्ञता व्यक्त केली आहे तर ‘रावसाहेब! या कवितेमधून फुले, शाहू, गाडगेबाबा, कर्मवीर अण्णा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षण प्रसाराचा वसा घेऊन गावातील मुलांना शिक्षणाची
संधी मिळावी म्हणून शैक्षणिक संस्था उभारणाऱ्या संस्था चालक रावसाहेब यांच्याबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त केली आहे. समाजविषयक चिंतनपर अशा ‘अगा पांडुरंगा’ ‘समाजसेवेच्या पडद्याआड’, आणि ‘का बोलविता’ कवितांमध्ये राज्यकर्ते, समाजसेवक आणि कार्यकर्ते या गोंडस नावाखाली काहीजन राजरोसपणे अन्याय-अत्याचार करतात, दहशत निर्माण करतात, सत्ताधारी बनतात आणि भ्रष्टाचार करतात हे सांगितले आहे. तसेच सण-उत्सवात आनंद घेणाऱ्या समाजाला वेटीस धरणाऱ्या अपप्रवृत्तीवर प्रकाश टाकला आहे.
या काव्यसंग्रहातील ‘चारोळ्या’ या काव्यप्रकारात दोन भागात ‘चिमुकल्या कविता’ मधून निसर्ग, समाज, राजकारण, पुढारी आणि पोलीस खात्यातील जीवनाचे अंतरंग उलगडले आहेत.
‘वड गेला
गेला पिंपळ;
बांधा बांधावर आता
निलगिरीची सळसळ’
पाखरांसाठी अन्न, सावली आणि घरटं देणाऱ्या वड-पिंपळाऐवजी निलगिरीची सळसळ पाखरांना पोरके बनवत असल्याची खंत व्यक्त केली आहे तर-
‘पुढारपणाची भाषा
भाषेला सत्तेची नशा;
अंगठे बहादूरही साला
उगीचच पिळतो मिशा’
काही पुढारी सत्ता स्थानी गेल्यावर त्यांच्या भाषेत बदल घडतो. ज्यांच्यामुळे ज्या मतदारसंघातून निवडून आले त्यांनाही काहीवेळा विसर पडतो हे या चारोळीतून सांगितले आहे तसेच-
‘मित्रहो पोलिसांना नेहमीच तुम्ही
कोणाचीही उपमा देता;
परंतु पोलीस आहेत म्हणूनच
बिनधास्त हक्काच्या घरात झोपता’
समाज स्वास्थासाठी सरकार सुस्थितीत चालविण्यासाठी पोलिसांची गरज आहे हे सत्य सांगितले आहे. या चारोळ्यांतून ‘घागर मे सागर’ चे दर्शन घडते.
सारांश कबीर ताटे यांच्या ‘शिधा’ या काव्यसंग्रहात बुद्ध, कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इ. महापुरुष, निसर्ग-प्रेम, भूक-गरीब, आई, बालजग, पोलिसी जीवन आणि आदर्श व्यक्ती इ. विषयावरील कवितांमधून कवीने मानवी मुल्यांचा पुरस्कार केला आहे. काही कवितांमधून मानवी जीवनातील स्वार्थ, वैगुण्यही दाखविले आहे. त्यांच्या कवितांची भाषा साधी सरळ कधी उपरोधिक आहे. बहुसंख्य कविता चिंतनशील आणि विचारवेधक आहेत. त्यांचा कवितेत लालित्य आहेच परंतु त्यांच्या कवितांमधील मानवतावादी विचार हा या काव्यसंग्रहाचा गाभा आहे. म्हणूनच त्यांचा शिधा हा संविधानवादी काव्यसंग्रह लक्ष्यवेधी आहे. या काव्यसंग्रहात काही उणिवा असल्यातरी त्यांनी केलेला पहिला प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे. या काव्यसंग्रहाचे बोलके मुखपृष्ठ, कवितांमधील आशय आणि लेखनशैली हृदयाला भिडणारी आहे. म्हणून मानव केंद्रीत संविधानवादी साहित्यप्रवाह समृद्ध करणाऱ्या कबीर ताटे यांना आणि त्यांच्या ‘शिधा’ या काव्यसंग्रहाला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अशीच संविधानवादी साहित्याची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.
-प्रा. डॉ. रघुनाथ आण्णा केंगार)
मा. सिनेट सदस्य, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर



















1 review for शिधा | Shidha
There are no reviews yet.
Write a customer review