दोन शब्दाश्रू
विसावं शतक ओलांडून आपण एकविसाव्या शतकात आलो आहोत. येऊनही अठरा वर्षे वाहून गेली. नव्या शतकात, प्रवेश करताना आपण आपली सर्व पाप, सर्व वाईट व दुष्ट गोष्टी गतशतकाच्या काळनदीत सोडून द्यावीत आणि निर्मळ, नितळ मनाने चांगल्या गोष्टी सोबत घेऊन नव्या शतकात पदार्पण करावे अशी अपेक्षा होती. पण तसे घडले नाही. भ्रष्टाचार अक्राळ विक्राळ रूप धारण करून आला. जातीजातींच्या करामती दाखवत राजकारणी लोक इथंही येऊन पोहचले. जातीचं मजबुतीकरण करून राजकारणात दबावतंत्राचा वापर करू लागले. जाती जिवंत ठेवून त्यातला माणूस मारू लागले.
शेतकऱ्यांची अवस्था तर अत्यंत बिकट झाली. डोक्यावर डोंगराएवढी कर्ज घेऊन बळीराजा याच वाटेनं एकविसाव्या शतकाकडे निघाला. तेव्हा नियतीने हळूच त्याच्या हातात एक दोरखंड दिला. तो कावराबावरा झाला. तेव्हा ती म्हणाली, “असू दे. वेळप्रसंगी संकटातून तुझी सुटका करील. भारतीय स्वातंत्र्याने काचक्राचे ७२ फेरे पूर्ण केले परंतु शेतकऱ्यांच्या दुर्दैवाचे फेरे अजून संपले नाहीत. केव्हा संपणार हे नियतीने कुणालाही सांगितले नाही. पूर्वीच्या काळी “उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी’ असं लोक म्हणायचे. म्हणून शेतकऱ्यांची बळीराजा ही पदवी तेजोमय दिसायची. आता जागांची अदलाबदल झाली. शेतीला प्रथम स्थानावरून तिसऱ्या स्थानावर फेकण्यात आलं आणि नोकरीला प्रथम स्थानावर आणून बसवण्यात आलं. बळीराजा स्थानभ्रष्ट झाला तेव्हाच आत्महत्या हे त्याचं प्राक्तन बनलं.
शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेला पारावार नाही. सरकारी मदत मिळेना, सावकारी कर्ज फिटेना अन् दारिट्याचं ग्रहण सुटेना! शेतात पिकेना, पिकलेलं विकेना, विकलेलं पुरेना अशा दरिद्री अवस्थेत तो मरणप्राय यातना भोगत जगत राहतो. नसता हाती दोरखंड घेऊन झाडावर चढतो. शेतकऱ्यांच्या आयुष्याची दोरी मध्येच तोडणारा हा दुष्ट दोरखंड जेव्हा तुटेल तेव्हाच बळीराजा महायातनातून सुटेल.
– ग.पि.मनूरकर




















1 review for दोरखंड | Dorkhand
There are no reviews yet.
Write a customer review