नव्वदोत्तर कालखंडातील तीव्र सामाजिक जाणिवा व्यक्त करणारे मारोती कसाब हे तत्वनिष्ठ शिक्षक, उत्तम संशोधक आणि चळवळीची जाणीव असणारे कार्यकर्ते कवी आहेत. २००५ साली पोरगं शेकत बसलंय’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर पंधरा वर्षांनी ‘रातदिन असे’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होतोय. त्यांच्या कवितेचा वेग कमी असला तरी ती सजगपणे आणि सलगपणे परिवर्तनाच्या दिशेने झेपावणारी कविता आहे. समकालीन वास्तवाचा उभा-आडवा छेद घेत ही कविता वाचकाला संभाव्य धोक्यांपासून सावध करते. समकालीन प्रश्नांकडे गंभीरपणे पाहायला लावते. वर्तमानाचा आढावा घेत; इतिहासाचे दाखले देत, भविष्यातील धोके समजावून सांगते. वाचकाला अनभिज्ञ असलेले जगण्याचे विविध स्तर उलगडून दाखविते. जीवनाचे व्यामिश्र दर्शन घडविते. हेच या कवितेचे लक्षणीय यश आहे,असे मला वाटते.
संत तुकारामांच्या बंडखोरीशी नाळ जोडणारी ही कविता समकालाचा एक्स रे काढून वाचकांपुढे ठेवते. महामानवांच्या विचारांवर उभी असलेली ही कविता वाचकांच्या काळजाचा ठाव घेऊन परिवर्तनाच्या दिशा सूचित करते. नव्या समताधिष्ठित, शोषण विरहीत समाज रचनेला सहाय्यभूत ठरणारी ही कविता वाचकांच्या पसंतीस उतरेल, असा मला विश्वास वाटतो. समाजाच्या भल्यासाठी कवी मारोती कसाब यांनी या पुढेही लिहीत राहावे, हीच मंगल कामना.
-प्राचार्य डॉ.वसंत बिरादार



















Reviews
There are no reviews yet.
Write a customer review